लातूर रिपोर्टर 16 जानेवारी 2022



 खरंच ऑनलाईन शिक्षण हे प्रगतीचं लक्षण आहे काय ?



सध्याच्या काळात शिक्षणाची जहाजे मोठया आवेशाने बुडवली जात आहेत शाळा बंद करून राजकीय मोर्चे काढले जात आहेत. पुढच्या पिढीचं भविष्य अंधारात ढकलत आहेत. खरं तर मुलांना शरीराने नाही तर मनाने अपंग केलं जात आहे. शाळा बंद करून कोरोना थोडंच हरणार शेवटी यात लेकराचं भविष्य मात्र संपणार आण सरकार निवडणूकीत गुंगणार...?



खरंतर मुलांना ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉप व कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून रहावे लागत असल्यामुळे डोळ्यांवर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे विद्यार्थांना डोळ्यांचा त्रास जाणवत असल्याचं समोर येत आहे. खरंतर ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली अनेक मुले ऑनलाईन शिक्षणाचं सोडून मोबाईल मध्ये गेम खेळण्यात मग्न होतात आणि यामुळे त्यांच्या बुध्दीवर डोळयावर व शरीरावर अनेक वाईट परिणाम भविष्यात बघायला मिळतील. त्याचप्रमाणे मोबाईलच्या अति वापरामुळे मुलं मैदानी खेळ खेळत नसल्याकारणाने विविध आजार बळावत आहेत. यामुळे आता नेमके करायचे काय? असा प्रश्न लहान मुले व पालकांसमोर उभा राहिला आहे.



सध्या कोरोनाच्या प्रसाराचं कारण पुढं करुन शाळा बंद करण्यात आल्या असून ऑनलाईन शिक्षण घेणे गरजेचे झाल्यामुळे आता पालकांना सुध्दा पर्याय ऊरला नसून मुग गिळून गप्प बसावं लागत आहे. मग अशा कारणामुळे शाळा नेहमी बंद राहिल्यास मुलांवर खुप परिणाम होतील आधी लहान मुलांनी मोबाईल मागितला तर त्यांना पालकांकडून विरोध केला जायचा. मात्र, आता ते शिक्षणासाठी हक्काने हातात मोबाईल घेत आहेत. अनेकदा शिक्षणासोबतच व्हिडिओ गेममुळे ते सतत मोबाईलवरच असतात. याचे त्यांच्या प्रकृतीवर वाईट • परिणाम होत आहेत. मात्र, मोबाईलसाठी लहान मुलांचा हट्टपणादेखील वाढला आहे. त्यामुळे पालकांना चिंता वाटणे साहजिकच आहे. जे मुलं परिस्थितीने गरीब आहेत, त्यांचे आई-वडील रोजंदारीवर कामाला जातात, ज्या मुलांकडे मोबाईल नाही, ज्यांची परिस्थिती मोबाईल घेण्यासारखी नाही तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे याचा पण विचार सरकारने करणे गरजेचे आहे.



लहान मुलांवर घरातील ज्येष्ठ नागरिकांचा वचक असायला हवा. त्यांना मोबाईल केवळ शिक्षण घेण्यासाठीच हातात द्यायला हवा. टेक्नॉलॉजी सोबत जुळवून घ्यायचे असले तरीदेखील आरोग्य हे जपलेच पाहिजे. त्यासाठी मोबाईलचा अतिवापर योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. खरंतर ५० टक्के क्षमतेने मॉल्स,दुकाने,कार्यालय,मंगल कार्यालये इत्यादी चालू असून मग शाळाच का पुर्ण पणे बंद? कोरोना तथा ओमिक्रॉन का फक्त शाळेतच हजेरी लावणार. बाकी ठिकाणी का विश्रांती घेणार? कमाल आहे शासनाच्या निर्णयाचा सध्या बघितलं गेलं तर या ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा विद्यार्थ्यावर खुप वाईट परिणाम होत आहे. सकाळी १० ते दुपारी ०४ वाजेपर्यंत वर्गातील तासिका असतात, त्या विषयानुसार तासिका हया ऑनलाईन घेतल्या जात आहेत. सतत ऑनलाईन क्लास असल्यामुळे मुलं मोबाईलच्या समोर बसून आहेत. आठ-आठ तास मुलं मोबाईलच्या समोर बसून असतील कानात बोळे घालून मोबाईलचं ऐकत असतील तर विचार करायची गोष्ट आहे की मुलांच्या आरोग्यावर काय परीणाम होणार. भविष्यात मुलं एकतर बहिरे होणार, अंधळे होणार आणि वरुन मनोरुगण सुध्दा.



मग या गोष्टींचा विचार करुन शासनाने हे सर्व थांबवावे कमीत कमी एक दिवसाआड शाळा सुरू ठेवाव्यात जेणेकरून मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही मुलांना शाळेतूनच मोबाईलच्या अतिवापराच्या दुष्परिणामाचे धडे द्यायला हवेत. हल्ली मुले मैदानी खेळ विसरली आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. एवढ्या लहान वयातच मोबाईलमुळे चष्मा लागला तर अजून पुढे काय होईल याची चिंता सतावत आहे. त्यासाठी लहान मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.



प्रश्नचिन्ह ?



अॅड. इकबाल रसूलसाब शेख



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या