पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्याकडून अण्णा भाऊ साठे नागरी दलीत सुधार योजनेतुन जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत कामाचा दर्जा न राखल्यास संबंधितावर कठोर कार्यवाही

 


पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्याकडून अण्णा भाऊ साठे नागरी

दलीत सुधार योजनेतुन जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर

योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत

कामाचा दर्जा न राखल्यास संबंधितावर कठोर कार्यवाही

 

लातूर प्रतिनिधी : १ फेब्रुवारी २१ :

   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेअंतर्गत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी महापालीका, नगरपालीका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरी सुविधा निर्माण करण्यासाठी तब्बल ४६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेतुन प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात निधी मंजूर झाला असून यातून दर्जेदार कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधित संस्थाच्या प्रमुक अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेतर्गत निधी वितरण व कार्यान्वयीन यंत्रणा ठरविणे बाबत मार्गदर्शक तत्वे विहित करुन जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेची सन २०२०-२१ अंतर्गत लातूर जिल्हयातील नागरी क्षेत्रासाठीचे निधी वितरण करण्याच्या अनुषंगाने दिनांक २५ जानेवारी २०२१ जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली.

    या बैठकीस जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव पृथ्वीराज बी.पी., समिती सदस्य तत्कालीन लातूर महानगरपालिका आयुक्त देविदास टेकाळे, सहाय्यक संचालक नगर रचना सुनिल मिटकरी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते, जिल्हा प्रशासन अधिकारी सतिष शिवणे व विशेष निमंत्रीत म्हणून जिल्हयातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी लातूर यांनी या योजनेअंतर्गत शासन नगर विकास विभागाने निर्देशित केल्यानुसार प्रास्ताविक माहिती सादर केली.

    यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी या योजने अंतर्गत २०२०-२१ करीता लातूर शहर महानगरपालिकेस रु. २० कोटी व जिल्हयातील नगरपरिषदा/नगरपंचायती करीता एकुण २६ कोटी असा एकूण रु. ४६ कोटी इतका भरघोस निधी मंजूर केला. या योजनेतर्गत् जिल्हयातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रथमत:च इतक्या मोठया प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला आहे.

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेअंतर्गत रस्ते, पोच रस्ते, जोड रस्ते, रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटकरण, नाली बांधकाम, विहीर दुरुस्ती तसेच डेांगरी उतारावर संरक्षण भिंत जसे कठडे बांधणे, छोटे पूल, पिण्याच्या पाण्यासाठी सोयीसुविधा, सार्वजनिक शौचालय, बालवाडीत बगीचे यामध्ये खेळाचे साहित्य, समाजमंदिर, वाचनालये, दवाखाने, सांस्कृतीक केंद्र, दुकाने, स्मशानभुमीचा विकास अशी सार्वजनिक हिताची अनुज्ञेय असलेले कामे हाती घेवून ती नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत यावर सर्वांनी गांभिर्याने लक्ष दयावे. निकृष्ट दर्जाची कामे झाल्यास अथवा याबाबत तक्रारी आल्यास संबंधित आयुक्त/मुख्याधिकारी यांचेवर व्यक्तीश: जबाबदारी निश्चीत करुन कार्यवाही केली जाईल अशा सूचना दिल्या आहेत.

    बैठकीच्या शेवटी सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी लातूर यांनी पालकमंत्री, समिती अध्यक्ष व उपस्थित सर्व समिती सदस्यांचे आभार मानून  बैठक संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या