जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा निधी खर्चासाठी योग्य प्रस्ताव सादर करावेत* *-पालकमंत्री अमित देशमुख*

 


                              *सर्व शासकीय यंत्रणानी जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 चा

निधी खर्चासाठी योग्य प्रस्ताव सादर करावेत*

                                                  *-पालकमंत्री अमित देशमुख*







*जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 सर्वसाधारण अंतर्गत 240 कोटी च्या तर विशेष घटक योजनेअंतर्गत 124   

  कोटीच्या खर्चाचा आढावा*

*जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 सर्वसाधारण योजनेअंतर्गत 275 कोटी तर विशेष घटक योजनेअंतर्गत 124   

  कोटी निधी मंजूर*

*मुंबईच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्युत दाहिनी निर्माण करावी*

*लातूर शहरातील सहकारी दूध डेअरीच्या जागेत देवणी गोवंश संशोधन केंद्राची स्थापना करावी*

*मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील पाणी साठ्यांच्या क्षमतेनुसार मत्स्य उत्पादनाचा आराखडा तयार करावा*

*ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत व ते किमान पाच वर्षे टिकली पाहिजेत याबाबत दक्षता

  घ्यावी*

*जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शौचालये झाली पाहिजेत व त्यामध्ये चांगली स्वच्छता ठेवली गेली पाहिजे*

*जिल्ह्यात अद्यावत जिल्हा ग्रंथालय निर्मिती बाबतचा प्रस्ताव सादर करावा*

*आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात*

*बहुजन समाजातील मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी जागेची पाहणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करावा*

*सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दर्जेदार पायाभूत सोयी सुविधा निर्माण कराव्यात*

*वीज वितरण कंपनीने जुने झालेले रोहित्र तात्काळ बदलण्याची कार्यवाही करावी*

*सर्व शासकीय यंत्रणा ने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करुन मंजूर निधी 100% खर्च करावा*

 

लातूर, दि.29(जिमाका):- जिल्हा नियोजन समितीच्या जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 सर्वसाधारण योजनेअंतर्गत 275 कोटी तर विशेष घटक योजनेअंतर्गत 124 कोटी असा एकूण 419 कोटीचा निधी मंजूर असून सर्व शासकीय यंत्रणांनी निधी मागणीचे प्रस्ताव योग्य पद्धतीने सादर करावेत व मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करावा, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.  

       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी  जितीन रहमान, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त  शिवकांत चिकूर्ते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.

          पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, पशुसंवर्धन विभागाने मुंबईच्या त्यांच्या शिखर संस्थेत ज्या पद्धतीने पाळीव प्राण्याच्या मृत्यूनंतर त्यांचे दहन करण्यासाठी विद्युतदाहिनी ची व्यवस्था केलेली आहे. त्या पद्धतीची व्यवस्था लातूर जिल्ह्यात करण्यासाठी जागेची पाहणी करून तात्काळ प्रस्ताव सादर करावेत. तसेच लातूर शहरातील जुन्या सहकारी दूध डेअरी च्या जागेत देवणी गोवंश संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

          मत्स्यव्यवसाय विभागाने लातूर जिल्ह्यातील पाणी साठवण क्षमता व त्या क्षमतेवर मत्स्योत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी चा आराखडा सादर करावा व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय करण्याबाबत प्रोत्साहित करावे अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी करून वन विभागाने नियोजन समितीकडून देण्यात आलेल्या निधीतून केलेल्या कामाची माहिती सादर करावी असेही त्यांनी सूचित केले.

          जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामीण भागात रस्त्याची कामे दर्जात्मक करावीत व ही कामे किमान पाच वर्षे टिकली पाहिजेत यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. अशी कामे देताना काम करण्याची  गुत्तेदार याची क्षमता बघितली गेली पाहिजे व चांगले काम करणाऱ्या गुत्तेदार यांनाच कामे दिली गेली पाहिजेत. जेणेकरून झालेल्या कामातून त्या त्या भागातील लोकांचे समाधान झाले पाहिजे व हीच आपली जबाबदारी असल्याचे मत पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.

          लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे. शौचालय निर्माण करताना पुढील काळात  शौचालयात योग्य ती स्वच्छता वेळोवेळी राखली गेली पाहिजे याबाबत ही दक्षता घ्यावी. मुला-मुलींसाठी वेगवेगळी शौचालयं असावीत असे पालकमंत्री देशमुख यांनी सूचित करून लातूर शहरात जिल्हा ग्रंथालयाची अद्ययावत इमारतीची उभारणी झाली पाहिजे यासाठी ग्रंथालय अधिकारी यांनी योग्य तो पाठपुरावा करून तात्काळ प्रस्ताव सादर करावा व यावर्षीच्या अखेरपर्यंत नवीन ग्रंथालयाची पायाभरणी होईल यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी निर्देशित केले.

            क्रीडा विभागाने जिल्हा वार्षिक योजनेत मंजूर निधीतून जिल्ह्यात हॉलीबॉल, कुस्ती इत्यादी क्रीडा प्रकारासाठी क्रीडा प्रबोधिनीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. तसेच आंतर जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात. लातूर शहरात स्विमिंग पूल निर्माण करण्यासाठी जागेची पाहणी करावी. तसेच लातूर जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू निर्माण होतील यासाठी खेळाडूंना पायाभूत सुविधा ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळाला पाहिजेत असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून क्रीडा विभागाने यासाठी अधिक तत्परता दाखवावी असेही त्यांनी म्हंटले.

          समाज कल्याण विभागाने बहुजन मुला मुली साठी शासनाकडून मंजूर असलेले प्रत्येकी 100 क्षमतेचे वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी महसूल प्रशासनाची संपर्क साधून जागेची पाहणी करावी. तसेच बहुजन समाजातील मुलांना वस्तीगृहचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी शंभर क्षमता असलेल्या दोन इमारती भाड्याने घेऊन  वसतिगृहाची सुरुवात करावी अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. त्याप्रमाणेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या व दर्जेदार सोयीसुविधा मिळतील यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

          वीज वितरण कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या रोहित्रा पैकी किती रोहित्र नादुरूस्त आहे त्याची माहिती घेऊन ती रोहीत्र तात्काळ दुरुस्त करावीत अथवा त्या ठिकाणी नवीन रोहित्र बसवावे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने शासनाच्या नियमानुसार प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घेतली पाहिजेत असेही त्यांनी सूचित केले.

तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या निधीतून योग्य व प्राधान्यक्रम ठरवून निधी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत व मंजूर झालेला निधी शंभर टक्के खर्च करावा असेही त्यांनी सूचित केले.

           यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज, मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल व आयुक्त मित्तल यांनी ही आपल्या सूचना मांडून अधिनस्त यंत्रणांकडून योग्य पद्धतीने व वेळेत काम पूर्ण करून घेण्यात येईल येईल असे सांगितले.

          प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी एम एस दुसिंग व सहाय्यक नियोजन अधिकारी रेड्डी यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 सर्वसाधारण योजनेअंतर्गत विभाग निहाय झालेल्या खर्चाची तसेच त्या त्या विभागाची सन 2021-22 साठीचे मागणी ची माहिती बैठकीत सादर केली. 

                                                                              ****               

वृत्त क्र.382                                                                            दिनांक:-29 मे 2021

 

*सेव और सोल्स संस्थेकडून कोविड मध्ये मृत्यू झालेल्या 177 कुटुंबातील व्यक्तींना 

पालक मंत्री देशमुख यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप*

 

**महापालिकेचे 23 रोजंदारी कर्मचारी झाले कायम*


लातूर, दि.29(जिमाका):- जिल्ह्यात covid-19 मुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 176 कुटुंबातील आई किंवा वडील या पैकी एकाचा मृत्यू झालेला आहे. तर एका मुलाचे आईचा मृत्यू पूर्वी झालेला होता तर वडिलांचा मृत्यू कोविड मुळे झालेला आहे अशा एकूण 177 कुटुंबांना शेव और सोल्स(एसओएस) या सामाजिक संस्थेकडून अन्नधान्य कीट देण्यात आले. या किटचे  वितरण पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाले.

          यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार, SOS संचालक मिरा सिंह, ॲड. किरण जाधव, समद पटेल सह अन्य मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.

          कोविड मुळे मृत्यू पावलेल्या 177 एकल कुटुंबातील व्यक्तींना 2 हजार किमतीचे कोरडे अन्नधान्य वाटप करण्यात येत असून या संस्थेच्या वतीने या कुटुंबातील महिलांचे समुपदेशन करण्यात आलेले आहे. तसेच यापैकी संजय गांधी निराधार योजनेतून अकरा लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले असून अठरा वर्षांपुढील चाळीस मुलांचे 

दत्तकत्व संस्थेने घेतल्याची माहिती दिली, महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पवार यांनी दिली.

          यावेळी एसओएस च्या संचालिका मीरा सिंह यांनी एसएस सामाजिक संस्थेकडून आज पर्यंत जिल्ह्यातील दोनशे मुलांचा सर्वांगीण विकास करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगितले. सद्यस्थितीत या संस्थेकडे 102 मुले असून त्यांचे योग्य पालन पोषण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या वतीने मुलांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला असून या कक्षात 50 बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

          प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते मनीषा संजय खंडागणे, हेमांगी स्वामी, संगीता जाधव राजकुमार पांचाळ यांना प्रातिनिधिक स्वरूपात अन्नधान्याचे वितरण करण्यात आले.

*महापालिकेचे 23 रोजंदारी कर्मचारी झाले कायम*

         लातूर शहर महानगर महानगरपालिकेकडे काम करणारे तेवीस रोजंदारी कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते महापालिकेने त्यांच्या सेवेत कायम केल्याचे आदेश प्रधान करण्यात आले.

               

                                ****

 वृत्त क्र.383                                                                           दिनांक:-29 मे 2021

*100% लसीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्येक

नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे*

                                              *-पालकमंत्री अमित देशमुख*

*गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी ऑक्सिजन  कॉन्सन्ट्रेटर अत्यंत महत्त्वाचं*

*रोटरी क्लब मार्फत देण्यात आलेले 15 ऑक्सिजन  कॉन्सन्ट्रेटर पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते आरोग्य विभागाकडे सुपूर्द*

*रिलायन्स फाउंडेशनने दिलेले 5 हजार मास्क पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते आरोग्य यंत्रणेकडे सुपुर्द*

*कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व प्रशासनाकडे*

 

लातूर, दि.29(जिमाका):- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये येणारी संभाव्य तिसरी लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील  लसीकरण मोहीम ही लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जात आहे. जोपर्यंत संपूर्ण देश, महाराष्ट्र व आपल्या जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

     जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, ॲड. किरण जाधव, समेद पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष ओमप्रकाश मोतीपवळे, रिलायन्स फाउंडेशनचे सत्यजित भोसले, अनुप देवणीकर राजगोपाल राठी, डॉक्टर माया कुलकर्णी आदी उपस्थित होते.

      पालक मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुळे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना चांगला फायदा होतो तसेच वेंटिलेटर बेड मिळेपर्यंत ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. तरी रोटरी क्लब मार्फत देण्यात आलेले हे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आरोग्य विभागाने आवश्यकतेनुसार वापरावेत. तर रिलायन्स फाऊंडेशन ने दिलेले 5000 मास्क हे गरजू लोकांना तसेच  फ्रंट लाईन वर्कर याना द्यावेत त्यांनी सूचित केले.

          शासन व प्रशासन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने विविध उपकरणे व साहित्य खरेदी करत असून जिल्ह्यात पुरेसा औषधी साठा ही निर्माण केला जाणार आहे तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे हलगर्जी न करता प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन पालकमंत्री देशमुख यांनी केले.

           कोविड मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील मुलांना जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत तोपर्यंत त्यांचे पालकत्व प्रशासनाकडे असेल असे सांगून पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. विविध सामाजिक संस्था कडून कोरोना महामारी विरुद्धच्या लढ्याला जी मदत दिली जात आहे ती फार मोलाची असून सर्व सामाजिक संस्थांनी या कार्यात यापुढील काळातही असेच सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

   रोटरी क्लब लातूर ही अत्यंत संवेदनशील सामाजिक संस्था असून लातूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केलेले आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सांगून रोटरी क्लब लातूर व रिलायन्स फाउंडेशन च्या कामाचे कौतुक केले. यावेळी रोटरी क्लबचे  अध्यक्ष मोतीपवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटेरियन सुधीर यांनी केले तर आभार  राजगोपाल राठी यांनी मानले.                                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या