खरीप हंगाम -2021 पिक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

 

                                                                    दिनांक:-31 मे 2021

 

खरीप हंगाम -2021 पिक स्पर्धेसाठी

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा





 

लातूर, दि.31(जिमाका):-रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला सहभाग नोंदविला आहे. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांकसाठी 31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी  शेतकऱ्यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

या खरीप  हंगामापासून पुर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यता येत आहे. सध्याच्या  पीक स्पर्धेतील महत्वाच्या बाबी पूढील प्रमाणे आहेत. पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल.खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तुर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफूल असे एकूण 11 पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क- सर्व गटासाठी पिक निहाय प्रत्येकी  रक्कम रुपये 300/-

अर्ज दाखल करण्याची दिनांक पूढील प्रमाणे आहेत. मूग व उडीद पीक – 31 जुलै व भात, ज्वारी ,बाजरी, मका,नाचणी (रागी) तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल- 31 ऑगस्ट पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरुन त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करुन तालुका कृषि अधिकारी  कार्यालयात दयावे.

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी  बक्षिस स्वरुप पूढील प्रमाणे आहे.स्पर्धा पातळी, सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये- तालुका पातळी पहिले बक्षीस 5 हजार रु. ,दुसरे बक्षिस 3 हजार रु. व तिसरे  बक्षिस 2 हजार रु. रुपये, जिल्हा  पातळी पहिले बक्षिस 10 हजार रु. दुसरे बक्षिस 7  हजार रु. व तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभाग पातळी पहिले बक्षिस  25 हजार रु. दुसरे बक्षिस  20 हजार रु. व  तिसरे बक्षिस 15 हजार रुपये, राज्य पातळी पहिले बक्षिस रु. 50  हजार रु. दुसरे बक्षिस 40 हजार रु व तिसरे बक्षिस 30  हजार रुपये आहे.

पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

                                       ****

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या