कौशल्य अकॅडमीचा अभिनव उपक्रम

 

कौशल्य अकॅडमीचा अभिनव उपक्रम 



---------------------------------------------------------
विद्यार्थ्यांच्या बुद्धीकौशल्याला चालना देण्याच्या 
उद्देशाने अविष्कार उपक्रमाची सुरुवात :  वैशाली देशमुख 
लातूर : विद्यार्थ्यांच्या बुद्धीकौशल्याला व्यवस्थित चालना देता यावी या उद्देशानेच आपण लातुरात अविष्कार लॅबोरेटरी उपक्रमाची सुरुवात करत असल्याची माहिती कौशल्य अकॅडमी   तथा  अविष्कार उपक्रमाच्या संचालिका  वैशाली देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना  दिली. 
आपल्याकडे तीच ती कालबाह्य होऊ पाहत असलेली शिक्षण पध्दती  प्रचलित आहे. या शिक्षण पध्दतीत  विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला, कल्पनाशक्तीला हवे तेवढ्या गती, वेगाने विकसित करणे अशक्य आहे. शिक्षण प्रणालीत योग्य वेळी आवश्यक ते बदल घडवले गेले नाहीत तर आपण अन्य विकसित देशातील शिक्षण पध्दतीच्या  तुलनेत आणखी १०० - २०० वर्षे मागे राहू शकतो. परिणामतः देशाची भावी पिढी उज्वल घडवणे अशक्यप्राय होऊ शकते, देशाला आर्थिक गुलामीचा सामना करण्याची वेळ येऊ शकते. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी कांहीतरी प्रभावी उपाय योजना अंमलात  आणणे आवश्यक होते, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, कल्पनाशक्तीला पुरेशी चालना देता येणे आवश्यक आहे.  त्यासाठीच आपण अविष्कार उपक्रमाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याचे   वैशाली देशमुख यांनी सांगितले. यासाठी आपण इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाला १२० असे एकूण ३६० प्रयोग विकसित केले आहेत. हे प्रयोग विद्यार्थ्यांनी आपल्या घरी साहित्य नेवून करून त्यासोबत देण्यात आलेल्या नोंदवहीत त्याबाबतची माहिती विश्लेषणात्मक स्वरूपात नमूद करावयाची आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल. आपल्याला देण्यात आलेला प्रयोग तो वेगवेगळ्या पध्दतीने  करून पाहू शकतो. परिणामतः त्याची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती आणखी विकसित होण्यास मोलाची मदत होईल. 
आपल्याकडे विद्यार्थ्यांवर पालक - शिक्षकांकडून अपेक्षांचे नाहक ओझे लादले जाते. त्यात विद्यार्थी घोकंपट्टीत गुरफटून जातो. विशेष म्हणजे यामध्ये आवश्यकतेपेक्षा अनावश्यक बाबीच त्याच्याकडून करून घेतल्या जातात. ज्याचा त्याला पुढील शिक्षणाकरिता कांहीही उपयोग होत नसतो. आजचा पालक इतर पालकांप्रमाणे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करता पालकांनी ही अनुकरण पद्धती सोडली पाहिजे. आपल्या मुलांना वाढवण्यापेक्षा त्यांना घडवणे खूप महत्वाचे आहे. हीच बाब आपण या अविष्कार उपक्रमाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे   देशमुख म्हणाल्या. या उपक्रमात अध्ययनापेक्षा प्रॅक्टिकलला अधिक महत्व दिले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून नाममात्र दिड  हजार रुपये प्रतिमाह शुल्क आकारले जाणार आहे. साहित्याची हाताळणी करण्यासाठी केवळ पाच हजार रुपये डिपॉझिट म्हणून स्वीकारले जाणार असून ते परत देण्यात येतील. शिक्षण देताना ते मातृभाषेतून दिले गेल्यास अधिक फायदा होऊ शकतो, असेही  देशमुख यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी शनिवार दि. २८ व रविवार दि. २९ ऑगस्ट असे दोन दिवस अविष्कार प्रदर्शनीचे आयोजनही करण्यात आले आहे.  अविष्कार उपक्रमाचा प्रारंभ रविवार, दि. २९ ऑगस्ट २०२१ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे  वैशाली देशमुख   यांनी यावेळी सांगितले. 
-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या