आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे अध्यक्षेत उदगीर येथे शांतता समितीची बैठक संपन्न


*आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे अध्यक्षेत उदगीर येथे शांतता समितीची बैठक संपन्न*


सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश 19 ते 30 या वयोगटातील तरुण आहेत. काही कारणामुळे हे तरूण अशा चुकीच्या पोस्ट करत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन लातूर पोलिसांनी केलं आहे





        लातूर रिपोर्टर न्यूज़


 याबाबत माहिती अशी की, दिनांक 14/06/2023 रोजी उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक शांतता समितीची बैठक संपन्न झाली.

             सदर बैठकीमध्ये आगामी काळात बकरी ईद (ईद-उल-अजहा) व आषाढी एकादशी सारखे महत्त्वाचे सण साजरे होणार असून त्या अनुषंगाने सदरचे सण अतिशय उत्साही वातावरणात व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

आगामी सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता लातूर जिल्हा पोलीस दलाची  तयारी पूर्ण झाली असून पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी सांगितले.

             तसेच सदर बैठकीत मार्गदर्शन करीत असताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करण्याच्या घटना घडल्या असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

             या सर्व बाबींना आळा घालण्याकरिता लातूर पोलिसांनी  ‘लातूर सोशल मीडिया वॉचर्स’ ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालू केली असून नागरिकांनी  सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केली आहे.

              सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची जनतेने प्रसारणापूर्वी सर्वप्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान आणि लातूर सोशल मीडिया वाचर्स टीमच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

              या सोशल मिडिया पेट्रोलिंगमुळे सातत्याने थेट आणि धडक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या कारवाई नुसार मागील काही दिवसाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

               या प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय न करता, त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येत आहे. 

            सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल, असं वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात विविध कलम व  कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना सुद्धा पालकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करण्यात आलेली असून त्यांना समज देण्यात आलेली आहे.


*पोलीस अधीक्षकांच्या सूचना*


- सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची यूझर्सनी सर्वप्रथम खात्री करणं अत्यावश्यक आहे.


- जुन्या वादग्रस्त घटनांचा काही समाजकंटक फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ते सोशल मीडियातून निराधार आणि खोट्या अफवा पसरवून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


- पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावं. त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा समाजमन दुखावलं जातील, अशा आशयाचं मत सोशल मीडियावर जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.


- सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट तयार करू नये किंवा फॉरवर्ड करू नये.


- कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, प्रत्युत्तर देताना शब्द जपून वापरावेत.


- सोशल मीडियावर प्रत्युत्तर देताना अपशब्दांचा वापर करणंही गुन्हा आहे.


- कोणत्याही वर्गाच्या, धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर आणि वाईट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी किंवा चिन्हाद्वारे; तसंच दृश्य देखाव्याद्वारे (व्हिजिबल रिपर्सटेशन) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला प्रचलित कायद्यानुसार दंड तसेच 3 वर्षांपर्यंत कारावासाची  शिक्षा होऊ शकते.


*तरुणांकडे लक्ष द्या.*


सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश 19 ते 30 या वयोगटातील तरुण आहेत. काही कारणामुळे हे तरूण अशा चुकीच्या पोस्ट करत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन लातूर पोलिसांनी केलं आहे.

              सदर बैठकीस उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, तहसीलदार तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी रामेश्वर गोरे, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, उदगीर शहर व तालुक्यातील जिल्हा परिषद चे माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पोलीस पाटील, ग्रामसेवक ,ईदगाह कमिटीचे अध्यक्ष, ईद दिवशी प्रवचन देणारे इमाम, तालुक्यातील तंटामुक्ती अध्यक्ष, व सुजान प्रतिष्ठित नागरिक  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या