आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे उस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली.


आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे उस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
लातूर (प्रतिनिधी )दिनांक ४ एप्रिल रोजी सदर बैठकीमध्ये आगामी काळात रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती व रामनवमी सारखे महत्त्वाचे सण व जयंती, मिरवणुका साजरे होणार असून त्या अनुषंगाने सदरचे सण अतिशय निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
           बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता लागू असून आगामी सण उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता लातूर जिल्हा पोलीस दलाची तयारी पूर्ण झाली असून पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक, सोमय मुंडे यांनी सांगितले. पोलीस दला तर्फे यापूर्वीच ठाणे स्तरावर शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडल्यास त्याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी तसेच सोशल मीडियावर कोणताही आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर आढळल्यास त्याबद्दलही पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावणार्‍या आक्षेपार्ह पोस्ट्स, मेसेज, स्टेटस शेअर करू नयेत अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
           पोलीस अधीक्षक म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे या ही वेळी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील सण-उत्सवातील, मिरवणूक दरम्यान कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला सर्वच बांधवानां एकत्र घेऊन पुढे जायचे आहे. दरवर्षीप्रमाणेच पोलीस दलाने या वर्षीही नियोजन केले असून आवश्यक ती दक्षता घेतली जाईल.
            मागील काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होईल असे स्टेटस, व्हिडिओ क्लिप्स,आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस तयार करून प्रसारित करण्याच्या घटना घडल्या असून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व बाबींना आळा घालण्याकरिता लातूर पोलिसांनी ‘लातूर सोशल मीडिया वॉचर्स’ ही व्यवस्था अधिक प्रभावीपणे चालू केली असून नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केले आहे.
             सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टची जनतेने प्रसारणापूर्वी सर्वप्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे. पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान आणि लातूर सोशल मीडिया वाचर्स टीमच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साइटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
या सोशल मिडिया पेट्रोलिंगमुळे सातत्याने थेट आणि धडक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या कारवाई नुसार मागील काही दिवसाच्या कालावधीत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
              या प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय न करता, त्यांच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येत आहे.
सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल, असं वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात विविध कलम व कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या काही अल्पवयीन मुलांना सुद्धा पालकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांनी केलेली पोस्ट डिलीट करण्यात आलेली असून त्यांना समज देण्यात आलेली आहे. जुन्या वादग्रस्त घटनांचा काही समाजकंटक फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ते सोशल मीडियातून निराधार आणि खोट्या अफवा पसरवून जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करून तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट तयार करू नये किंवा फॉरवर्ड करू नये.कोणत्याही पोस्टला प्रतिक्रिया देताना संयम बाळगावा, प्रत्युत्तर देताना शब्द जपून वापरावेत.सोशल मीडियावर प्रत्युत्तर देताना अपशब्दांचा वापर करणंही गुन्हा आहे.कोणत्याही वर्गाच्या, धर्माच्या किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने हेतूपुरस्सर आणि वाईट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी किंवा चिन्हाद्वारे; तसंच दृश्य देखाव्याद्वारे (व्हिजिबल रिपर्सटेशन) त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला प्रचलित कायद्यानुसार दंड तसेच 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

*तरुणांकडे लक्ष द्या.*
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश 19 ते 30 या वयोगटातील तरुण आहेत. काही कारणामुळे हे तरूण अशा चुकीच्या पोस्ट करत आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं, असं आवाहन लातूर पोलिसांनी केलं आहे.
सदर बैठकीस जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी आधिकारी, सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चिकटे, आसिफ बागवान, रवी गायकवाड, अफजल कुरेशी, प्राध्यापक लांडगे तसेच इतर मुस्लिम समाजाचे, विविध हिंदू संघटनाचे पदाधिकारी, तसेच बौद्ध समाजाचे नागरिक, समाजसेवक व सुजान प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
              शांतता समितीच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलीस उपाधीक्षक (गृह) गजानन भातलवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या