मनपा आयुक्तांची लोकहिताकडे पाठ भाजपा उपाध्यक्ष कौळखेरे यांचा आरोप




मनपा आयुक्तांची लोकहिताकडे पाठ
भाजपा उपाध्यक्ष कौळखेरे यांचा आरोप
लातूर ः शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होवून अनेक कोरोनाबाधीत रूग्ण उपचार घेत आहेत. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याबाबत सुचना करण्यासह लोकहिताच्या अनेक समस्यांसाठी गेल्या कांही दिवसापासून भाजपाचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांची भेट घेण्यासाठी वेळ मागत आहेत. मात्र मनपाआयुक्तांकडून याच कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी लोकहिताकडे पाठ फिरवली असल्याचे जाणवत असल्याचा आरोप शहर जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष महेश कौळखेरे यांनी केला आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात मोठ्याप्रमाणात होत असून अनेकजणांना या संसर्गाची बाधा होत आहे. कोरोनाचा ससंर्ग अधिक पसरू नये आणि त्याची साखळी तोडली जावी याकरिता मनपा प्रशासन काय उपाययोजना करत आहे याची माहिती जाणून घेण्यासह याबाबत सुचना करणे विरोधी पक्ष म्हणून भाजपा बांधील आहे. त्याचबरोबर शहरात ज्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात येत आहे. या कंटेन्मेंट झोनमधील असलेल्या नागरिकांना सुविधा पुरविण्याचे काम मनपाचे आहे. मात्र या झोनमध्ये नागरिकांना सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. विशेष म्हणजे कंटेन्मेंट झोन उभारण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे तक्रारी भाजपा नगरसेवकांनी केलेल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमधील सुविधा पुरविणे गरजेचे असतांनाही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासारख्या विविध समस्या मनपा आयुक्तांच्या कानावर घालून याबाबत सुचना करण्यासाठी भाजपा नगरसेवकांसह शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांकडे वेळ मागीतलेली होती. वास्तविक लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला मोठे महत्व असून विरोधी पक्षाने मांडलेल्या सुचना आणि प्रश्‍न याकडे लक्ष देणे मनपा आयुक्तांना क्रमप्राप्त आहे.
भाजपा शिष्टमंडळाकडे पाठ फिरवत मनपा आयुक्त केवळ पालकमंत्री आणि महापौरांच्या इशार्‍यावरच काम करत आहेत की काय? अशा शंका यामुळे उपस्थित होवू लागल्या असल्याचा आरोप भाजपाचे शहर जिल्हाउपाध्यक्ष महेश कौळखेरे यांनी केला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा स्विकृत सदस्य गुरूनाथ मगे, सभागृह नेते अ‍ॅड.शैलेश गोजमगुंडे, स्थायी समिती सभापती अ‍ॅड.दिपक मठपती यांनीही याबाबत आयुक्तांना वेळ मागीतलेला आहे. मात्र लोकहितांकडे पाठ फिरवत केवळ सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावर नाचणार्‍या मनपा आयुक्तांना लोकहिताचा विसर पडल्याचे या माध्यमातून जाणत असल्याचा आरोप भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष महेश कौळखेरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या