कोरोनातून मिळालेले जीवनदान निसर्ग संवर्धनासाठी द्या. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे आवाहन.

 

कोरोनातून मिळालेले जीवनदान निसर्ग संवर्धनासाठी द्या.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचे आवाहन.





कोरोना संकटाचा सामना करत सध्या अनेक रुग्ण बरे होत आहेत. त्यातील काहींना तर ऑक्सिजनच्या तुटवड्याचा भयंकर प्रत्ययही आला आहे. यातून लोकांना आता निश्चितच ऑक्सिजनचं महत्त्व कळाले आहे. त्यामुळे कोरोनातून मिळालेल्या जिवनदानाचा उपयोग लोकांनी निसर्गसंवर्धनासाठी करावा, असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
सध्या, कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच वाढत्या रुग्णसंखेच्या मानाने बाधितांना लागणारा पुरेसा ऑक्सिजन साठा राज्यात शिल्लक नाही. त्यामुळे बऱ्याच रुग्णांचे हाल होत असून त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईक, मित्रमंडळींची चांगलीच धावपळ होत आहे. परंतु, जसे संकटातूनही काही चांगले घडते म्हणतात. त्या उक्तीचा कोरोनामुळे का होईना; लोकांना आता ऑक्सिजन व झाडांचे महत्व पटले आहे. ज्यांना कोरोनातून जीवदान मिळाले आहे. अशा प्रत्येकाने निसगांचे देणे म्हणून एक झाड लावून ते जगवावे. यातून निसर्गसेवाही घडेल आणि स्वतःला आत्मिक समाधानही मिळेल.  
झाडे जगवण्याची हमी द्याल... तर झाडेही देऊ
सध्या, पर्यावरण व निसर्ग संवर्धन मोहिमेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीमद्वारे शहरात वृक्ष लागवड व वृक्षसंगोपन केले जात आहे. लातूरकरांनी जर झाडे जगवण्याची हमी दिली. तर त्यांना ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून झाडे देण्यात येतील. त्यांनी  ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांसोबत संपर्क करावा.
माणसांना जगण्याकरीता अन्न पाण्याशिवाय ऑक्सिजन या प्राणवायूची जास्त गरज भासते हे त्रिवार सत्य कोरोना महामारीने अधोरेखीत केले आहे. मात्र माणसांनीच वृक्षांची बेसुमार कत्तल करुन पृथ्वीला भकास करण्याचा चंग बांधला आहे, त्याचे भयंकर परिणाम माणसांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. तरीही लोकांना याची कसलीही चिंता असल्याचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत कोरोनाने एकप्रकारे लोकांना भविष्यातील संकटांची जाणीव करून दिली आहे, असे म्हटले तरीही वागवे ठरणार नाही.
त्यामुळे लोकांनी आतातरी जागे होणे गरजेचे असून संपूर्ण सृष्टीचा समतोल साधण्यासाठी प्रत्येकाने आपापले योगदान देणेही तितकेच आवश्यक आहे. यासाठी आता कोरोना संकटाचा यशस्वी सामना करून ज्यांना जिवनदान मिळाले आहे, अशांनी प्रत्येकी एक झाडे लावावे. तसेच फक्त झाड लावून न थांबता ती जगलीच पाहीजे, यासाठी त्यांनी हे जिवनदान निसर्गसंवर्धनासाठी देऊन यामध्ये आपले बहुमूल्य योगदान द्यावे, असे आवाहनही ग्रीन लातूर वृक्ष टीम सदस्यांनी केले आहे.

ग्रीन लातूर वृक्ष टिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या