माजी मंत्री आ. निलंगेकरांच्या आश्वासनाने दिव्यंगाचे उपोषण मागे

 

माजी मंत्री आ. निलंगेकरांच्या आश्वासनाने दिव्यंगाचे उपोषण मागे



लातूर/प्रतिनिधी ः- अपंग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी  लातूर येथील गांधी चौकात दि. 22 डिसेंबर पासून दोन दिवसीय उपोषण करण्यात येणार होते. दिव्यांगाच्या ज्या मागण्या होत्या त्या न्याय असून त्याची तात्काळ पुर्तता व्हावी अशी मागणी त्यांची होती. या उपोषणाची दखल घेत माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिव्यांगाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही लेखी पत्राद्वारे दिली आहे. यामुळे दिव्यांग बांधवानी दि. 22 डिसेंबर रोजी रात्री आपण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
ज्या कुटूंबामध्ये दिव्यांग व्यक्ती आहेत अशा संपूर्ण राज्यभरातील कुटूंबासाठी मालमत्ता व नळ करात सुट देण्यात यावी, स्थानीक स्वराज्य संस्थाचा राखीव असणारा पाच टक्के निधी एकत्र करून दरवर्षी दिव्यांग लाभार्थ्यांस त्यांच्या  बँक खात्यात थेट जमा करावा, लातूर महानगर पालिकेच्या वतीने राखीव ठेवण्यात आलेला पाच टक्के निधी वर्षाच्या वर्षाला शहरातील सर्व दिव्यांगांना आर्थिक स्वरुपात वाटप करावा, यासह  संजय गांधी निराधार योजनेचे मासिक मानधन तीन हजार करण्यात यावे या मागण्यांसाठी अपंग हक्क स्वाभीमानी प्रतिष्ठान यांच्या वतीने दि. 22 व 23 डिसेंबर रोजी उपोषण करण्यात येणार होते. त्यानुसार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमद हरणमारे यांच्यासह दिव्यांगांनी लातूर येथील गांधी चौकात दि. 22 डिसेंबर रोजी सकाळपासून उपोषणास सुरुवात केली होती. दिव्यांग्याच्या उन्नतीकरीता आणि त्यांना आधार देण्याकरीता जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर हे पहिल्यापासून आग्रही राहिले आहेत. आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात आणि सध्याही दिव्यांगाच्या उन्नतीकरीता ते सातत्याने अग्रेसर राहिलेले आहेत. लातूर येथील गांधी चौकात दिव्यांग विविध मांगण्याकरीता उपेाषण करीत असल्याची माहिती माजी मंत्री आ. निलंगेकर यांना माहिती प्राप्त झाली.
या उपोषणाची माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी तात्काळ दखल घेत दिव्यांग उपोषणकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत आपण उपेाषण मागे घ्यावी अशी विनंती केली. त्याचबरोबर आपल्या न्याय मागण्याकरीता शासन व प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून या मागण्या मान्य करून देण्याकरीता आपण बांधील राहू असे लेखी पत्र प्रतिष्ठानचे अहेमद हरणमारे यांना प्रतिनिधीच्या हस्ते देऊ केले. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेली चर्चा आणि दिलेले आश्वासन यामुळे दिव्यांग बांधवानी आपले उपोषण दि. 22 डिसेंबर रोजी रात्रीच मागे घेत असल्याची घोषणा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या